Thursday 16 March 2017

बौद्ध धम्माबद्दल बाबासाहेबांचे विचार..

बौद्ध धम्माबद्दल बाबासाहेबांचे विचार..........

•माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत. जगाचं कल्याण फक्त बुद्ध धम्मच करु शकेल.

•तरुण लोक धर्माविषयी बेफिकीर बनत चालले आहेत हे पाहुन मला दुःख होते. काही लोक समजतात तशी धर्म ही अफुची गोळी नाही. माझ्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा माझ्या शिक्षणाचे फायदे समाजाला द्यावेत असे मला वाटते ते माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म पाहिजे पण धर्माच्या नावावर ढोंगीपणा मला नको आहे.

•बुद्ध हा साधासुधा मानवपुत्र असुन तो शेवटपर्यंत साधा मनुष्य राहिला व त्याने पददलित जनतेला आपल्या धर्माचे दरवाजे खुले केले, हे जगमान आहे, त्याने जन्मतः अलौकिक असण्याचा आव आणला नाही की अलौकिक चमत्कार
करण्याची शक्ती आपल्या अंगी असल्याचे भासवुन जनतेला केव्हाही फसविले नाही

•दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही, परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार कराव हाच एक उपाय.

•बौद्ध धम्म महासागरासारखा आहे. त्यात कोणत्याही प्रकाराचा भेदभाव नाही. भगवान बुद्धाने करुणेचा प्रचार करुन त्या काळातील पददलित लोकांची मने आकर्षित केली व त्यांना योग्य मार्ग दाखविला.

•बौद्ध धम्म हा वास्तववादी आहे. नुसत्या काल्पनिक गोष्टींवर बुद्धाचा विश्वास नव्हता.

•भगवान बुद्धांनी जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी धर्म स्थापिला. इतर धर्म देव व मनुष्य यांच्यामधील संबंध जोडणारे आहेत. माणसामाणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्वांनुसार जोडणारा बौद्ध धर्म हा एकच धर्म आहे.

•बुद्धाने जगाला एक अत्यंत महान अशी गोष्ट सांगितलेली आहे. मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होऊ शकणार नाही असे बुद्धाचे सांगणे आहे. बुद्धाची विचारसरणी ही लोकशाहीची विचारसरणी आहे.

•बौद्ध धर्माचा वृक्ष भारतात अद्यापही जिवंत आहे. फक्त त्याचा पाला सुकलेला आहे. अशी माझी खात्री आहे कि या वृक्षाला खतपाणी घातले तर हा वृक्ष पुन्हा फोफावेल.

•बौद्ध धर्माचा प्रारंभ पक्क्या पायावर झालेला आहे. हा धर्म मानवधर्म आहे. या धर्माशिवाय मानवाच्या कल्याणाचा दुसरा कोणताही उपयुक्त धर्म नाही.

•मी बौद्ध धम्माचे चक्र पुन्हा गतिमान करेन, माझ्या गुरुचा उपदेश दाही दिशांत पसरवीन.

•बुद्धाचे तत्त्वज्ञान चातुर्वर्ण्यव्यवस्था, जातीभेद नाकरते म्हणुन मला ते आवडते. बुद्धांनी केवळ जातीव्यवस्थेविरुद्ध हत्यार उपसले नाही, तर तर आपल्या संघात शुद्रातिशुद्रांना सन्मनाने जागा दिली.

•बौद्ध धम्म म्हणजे हिरे, माणिक, मोत्यांची खाण आहे. ही मी तुमच्यासाठीच शोधली आहेत यातील जवाहिरांचा मुक्त वापर करा.

•सागरामध्ये मिळाल्यावर ज्याप्रमाणे गंगा नदीचे पाणी ओळखणे अशक्य असते त्याचप्रमाणे बौद्ध धम्मात आपल्या जाती नष्ट होवुन सर्व समान होतात. असे सांगणारे एकच महापुरुष होत आणि ते म्हणजे भगवान बुद्ध.

•भारतालाच नव्हे तर सर्व जगाला सदाचार शिकविणारा पहिला महापुरुष भगवान बुद्ध होय.

•बौद्ध धम्माच्या दृष्टीने सध्याची भारतातील स्थिती शुन्यवत आहे. त्यासाठी आपण धम्माचे चांगल्या प्रकारे पालन करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे, कारण बौद्ध
धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगामध्ये जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांती राहणार नाही.

•जगाचे कल्याण फक्त बुद्ध धम्मच करु शकेल. त्या धम्माचा आदी, मध्य व अंत सर्व गोड, हितकारक व कल्याणकारी असा आहे.

•बुद्धाने सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वांतत्र्याचा पुरस्कार केला आहे. तसेच केवळ माणसामाणसातील समानता नव्हे, तर स्त्री आणि पुरुष यांच्यातही त्याने समानता प्रस्थापित केली आहे.

•बौद्ध धम्माचा जीवनमार्ग चिरंतन आहे, तो पुर्ण लोकशाहीवादी आहे. बुद्ध हे लोकशाहीचे महान पुरस्कर्ते होते. बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासुन परावृत्त करण्याचे
आहेत. मनुष्यमात्राचे दुःख नि निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धत सांगीतली आहे ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.

•बुद्धाचा हा खरा मानवी धर्म आहे. बुद्धाने आपण ईश्वराचे अवतार आहोत असे केव्हाही व कोठेही सांगितले नाही.  म्हणुनच बौद्धधम्म हा मानवधम्म आहे, मानवाच्या संपुर्ण विकासासाठी तो प्रयत्नशील आहे. तो आमच्यासारख्या
आधुनिक व अद्ययावत असलेल्या प्रत्येक मनुष्याला पटकन पटु शकतो. बुद्धाची शिकवण अगदे साध्या व स्पष्ट शब्दात मांडलेली आहे. या धम्मामध्ये मनुष्यास पुर्ण वैयक्तिक स्वातंत्र्य दिले आहे व मानवतेला आणि सदसद्विवेक बुद्धीला
पटतील त्याच गोष्टी ग्राह्य मानण्यात आल्या आहेत.

•बुद्धाचा धर्म कम्युनिझममध्येही आहे. बौद्ध धर्मातील भिक्षुप्रमाणे कम्युनिस्टांना ठराविक जीवनोपयोगी वस्तु ठेवण्याचा अधिकार आहे. संघामध्ये प्रत्येक भिक्षुला सातच वस्तु ठेवण्याचा अधिकार असतो.

•बौद्ध धर्म व हिंदु धर्म यांची तुलना केल्यास आपणास असे दिसुन येते कि बौद्ध धर्माचा पाया नैतिक आचरण हा असुन हिंदु धर्माचा पाया कर्मकांडांचे आचरण हाच आहे. स्नानसंध्या, जपजाप्य, सोवळेओवळे व यज्ञयाग यात हिंदु धर्म सामावलेला आहे. तर केवळ नैतिक आचरण म्हणजेच बौद्ध धर्म होय. बौद्ध धर्मात देव नाही ही करी गोष्ट आहे. देवाची जागा बौद्ध धम्मात नैतिक आचरणाने भरुन काढलेली
आहे.

•बुद्धाने अहिंसेबरोबरच इतर अनेक गोष्टींचाही हिरीरीने पुरस्कार केला आहे. हि गोष्ट विसरता कमा नये. सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचाही बुद्धाने
पुरस्कार केलेला आहे. बौद्धधर्म हा नव्या जगाला सर्वतोपरी साजेसा असा धर्म असुन तो इहलोकीच मनुष्यमात्राला मुक्त करण्यास सर्वतोपरी समर्थ असाच धर्म आहे. म्हणुन मेल्याशिवाय स्वर्ग न दिसु देणाऱ्या इतर कोणत्याही धर्मापेक्षा तो केव्हाही श्रेष्ठच ठरणार.

•बौद्धवाद व ब्राह्मणवाद यामधील फरक व भेद नीट लक्षात ठेवण्यास मी तुम्हास सांगत आहे. यापैकी एकाची तुम्हास निवड करायची आहे. बुद्ध हा मानव होता. बुद्धाची तत्वे जातीवर्गाविरुद्ध होती. बुद्धाने सामाम्य जनतेत वास्तव्य केले आणि मानवी दृष्टीकोनातुन जनतेची दुःखे दुर करण्याचा प्रयत्न केला.

•साऱ्या भारत देशाने बौद्ध धर्म स्विकारावा. बौद्ध धर्म व हिंदु धर्म एकच आहे ही गोष्ट खोटी आहे. त्यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे.

•बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदु धर्मातील मते आणि दैवते बौद्ध धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध चालणार नाही.

•नवीन झालेल्या बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे कि त्यांनी दर रविवारी बौद्ध विहारात गेले पाहिजे असे जर झाले नाही तर नवी बौद्धांना धर्माचा परिचय होणार नाही.
यासाठी ठिकठिकाणी बुद्ध विहारे निर्माण झाली पाहिजेत. विहारात सभा घ्यायला जागा असावी. लंका, बर्मा, थायलंड इत्यादी देशातील भिक्षुंनी पुढाकार घेऊन
पैसा गोळा करावा व भारतातील बौद्ध लोकांना मदत करावी.

•बुद्धाच्या शिकवणुकीनुसार वर्तन केल्यास आजचे सर्व रामाजिक प्रश्न चुटकीसरशी सोडविता येतील यात शंका नाही.

•बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या मंडळींना बौद्ध म्हणुनच संबोधले पाहिजे. बौद्ध धम्मात नवबौद्ध असा वेगळा पोटभेद किंवा वेगळी जमात नाही. बौद्ध धम्मेय म्हटला की तो सर्व एकच होय. बौद्धांत नवा बौद्ध आणि जुना बौद्ध असा प्रकारच नाही. बौद्ध तेवढे सारे एका बौद्ध नावानेच ओळखले जातात, अशी वस्तुस्थिती आहे, त्यामुळे विद्वाण, जाणते यांनी भारतीय नव-दीक्षित बौद्धांना नव-बौद्ध म्हणणे सर्वस्वी चुक आहे. या समाजाला बौद्ध असेच म्हटले पाहिजे.

•बौद्ध धर्माशिवाय अस्पृश्यांना दुसरा कोणताही मुक्तीचा मार्ग नाही.

•बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. तो केवळ धर्म नसुन तो एक महान सामाजिक सिद्धांत आहे.

•बौद्ध धर्माचा पाया नैतिक आचरण हा आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही मानवी मुल्ये या धर्माने स्वीकारली आहेत. कर्मकांड, जातीभेद यांना बुद्धाने नकार दिलेल आहे. त्यांच्या धम्माचा प्रमुख हेतु ऐहिक जीवनात मनुष्याला सुख शांती, आनंद प्राप्त व्हावा हा आहे.

•बुद्धाचा धर्म म्हणजे नीती. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतली आहे. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे. जर धर्म चालु राहावयाचा असेल तर तो बुद्धिप्रामाण्यवादी
असला पाहिजे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे.

•मला बौद्ध धर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात तीन तत्वे सापडत नाही, ती मला बौद्ध धर्मातच सापडतात. बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवितो. तो अंधश्रद्धा नि
अद्भुतता शिकवीत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तीन तत्वे शिकवितो. देव किंवा आत्मा समाजाचा उद्धार करु शकत नाही. मार्क्सवाद आणि
साम्यवाद यांनी जगाचे सर्व धर्म हादरुन टाकले आहेत.

•बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पुर्ण उत्तर आहे. रशियन साम्यवादाचा उद्देश रक्तरंजित क्रांती घडवुन आणणे हा आहे. बुद्धप्रणित साम्यवाद हा रक्तहीन क्रांती घडवुन आणतो.

•मला कोणी अंधभक्त नकोत. बौद्धधर्मात ज्यांना यावयाचे आहे त्यांनी जाणिवेने यावे. तो धर्म बुद्धीला पटला पाहिजे. ज्यांना माझ्याबरोबर यायचे नाही त्यांना कुठेही जायला मोकळीक आहे.

•बुद्धाची शिकवण कार्यकारणभाव व अनुभव यावर आधारलेली असल्यामुळे त्याचे अनुयायी त्याच्या शिकवणुकीत योग्यवेळे व अटळ परिस्थीतीत अमलात आणता
येत नसेक तर तिच्यामध्ये दुरुस्ती किंवा तिचा संपुर्णतया त्याग करण्यास स्वतंत्र आहेत. बुद्धधर्म नैतिकतेवर आधारलेला आहे. सामाजिक गरजांच्या पोषणातुन निर्माण झालेली नैतिकता ही एक बाह्य शक्ती आहे. बुद्धाचा धम्म म्हणजे
नैतिकतेशिवाय दुसरे काहीच नाही.

•बौद्ध धर्माचा इतिहास म्हणजे एक तृतीयांश मानवजातीच्या गेल्या अडीच हजार वर्षातल्या सुधारणेचा इतिहास आहे.

•बुद्धाचा मार्ग अधिक व्यावहारिक आहे. दुःख आहेच, मात्र ते जाणण्याची शक्ती माणसाचे ठायी असली म्हणजे झाले. सारांश, बुद्धाचा धर्म हा विशेषतः मानवी आहे, दैवी नाही.

•हिंदु लोकांना आपले राष्ट्र जगवायचं असेल तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे.
•बौद्ध धर्माचा प्रसार करणे हे प्रत्येक बौद्धाचे कर्तव्यच होय. एवढी गोष्ट कोणत्याही देशातील लोकांनी लक्षात ठेवली म्हणजे पुरे आहे. बौद्ध धर्माचा प्रसार करणे म्हणजे
मानवसेवा करणे होय. हा विश्वास ठेवला म्हणजे कार्य यशस्वी होणार.

•बौद्धधर्म हा बहुजन लोकांच्या हिताकरीता, सुखाकरिता, त्यांच्यावर प्रेम करण्याकरिता आहे. हा धर्म नुसत्या माणसांनीच स्वीकारुन चालणार नाही, तर
देवांनीसुद्धा त्याचा स्वीकार करावयास पाहिजे.

•बौद्ध धर्मात मात्र भेदभाव नाही, सर्वत्र समसमानता आढळुन येईल.

•आता बौद्ध धर्माची लाट आली, तर ती कधीही परत जाणार नाही. धर्म स्थापनेसाठी देवळाची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु स्वकष्टाने मला एक देऊळ बांधावयाचे
आहे की जे तुम्ही कधी पाहिले नसेल. पण त्याकरिता मी कोणा धनिकापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही. तुम्ही पैसे जमवुन देत असाल तर बांधीन व चांगले बांधीन. आपल्या पराक्रमाने बांधीन, दुसऱ्याच्या ओंजळीने बांधणार नाही.

•बौद्ध विहारे प्रत्येक खेड्यापाड्यातुन उभारली पाहिजेत व लाखोंच्या संख्येने बौद्ध वाङ्मयाचा प्रसार झाला पाहिजे.

•आपला महाराष्ट्रसुद्धा शंभर टक्के बौद्धमय होता आणि त्याला पुरावा म्हणुन महाराष्ट्रातील पुरातन काळाच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील, भारतातील
दीडहजार लेणी महाराष्ट्रातच आहेत. ही लेणी म्हणजे बौद्ध भिक्षुंची राहण्याची ठिकाणे होती. महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत असे सांगण्यात आले, परंतु विराट नगरी कोठे आणि पांडवांचे राज्य कोठे?

•माझे आयुष्य थोडे राहिले आहे. दुर्दैवाने जी सामाजिक कार्ये माझ्याकडुन कदाचित पुर्ण झाली नसतील, पण मी निश्चय केला आहे. इतर कार्यातुन मी निवृत्त होणार आहे, मला आता बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य करावयाचे आहे.

•बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या नियमाप्रमाणे वागायला पाहिजे. तलवारीच्या धारेप्रमाणे शुद्ध आचरण करणारे पाचच अनुयायी मिळाले तरी पुष्कळ
झाले.

•बौद्ध धर्म मी स्वीकारला आहे, तुम्हीही स्वीकारा. नुसत्या अस्पृश्य समाजाने तो स्वीकारुन चालणार नाही, तर साऱ्या भारताने व त्याचबरोबर साऱ्या जगानेही बुद्धाचा धर्म स्वीकारावा अशी माझी इच्छा आहे.

•बुद्धाचे तत्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे. त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासुन दुर व शांततेच्या नजीक जाईल.

•मानवतेचे संपुर्ण संरक्षण करण्यासाठी भारतालाच काय पण सार्या जगाला शेवटी बुद्ध धर्माची कास धरावी लागेल.

•बौद्धकाळात साहित्य आणि तत्त्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशांतील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापुर्वी कधीही असा गौरव भारतास प्राप्त नव्हता.

•माझा गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणुकीपासुन ते मी काढले आहे, माझ्या तत्त्वज्ञानात बंधुतेस क़्हार उच्च स्थान आहे.

•मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मानसन्मान वाटेल अशी कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मडके अडकवुन घेत आहोत असे मानु नका. बौद्धधर्माच्या दृष्टीने भारताची भुमी सध्या शुन्यवत आहे. आपण महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीला आणला असे होवु नये, म्हणुन आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण
आपल्याबरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करु. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे.

•जर लोक पुन्हा बौद्ध धर्माचा अंगीकार करतील तर आपला पुन्हा वैभवाप्रत गेल्याशिवाय राहणार नाही.

•बुद्धाचे तत्त्वज्ञान चातुर्वर्ण्यव्यवस्था व जातिभेद नाकारीत आहे, म्हणुन मला ते आवडते.
•बौद्ध धर्म हाच जागतिक ऐक्याचा एकमेव, अद्वितीय असा धर्म आहे.

•बुद्धाने चार वर्णांवर कु-हाड चालविल्यामुळेच ब्राह्मण त्याचा द्वेष करु लागले, हीच खरी वस्तुस्थिती आहे.

•भगवान बुद्धाने आनंदाला हेच सांगितले- मी सांगतो म्हणुन हा धर्म घेवु नका. व्यवहारात हा धर्म चालु शकेल असं वाटलं तरच घ्या. तुमच्या बुद्धीला पटला तर हा धर्म माना. एकजिवाने, एकचित्ताने आपणास गेले पाहिजे. याच मार्गाने आपला उद्धार होईल.

•बुद्धाने नुसती शांतताच सांगितली नाही. बुद्ध हा खरा विचारवंत होता. त्यांच्यासारखा विचारवंत अजुन पर्यंत जगात झालाच नाही.

•खरोखरच कोणाला जज्ती मोडावयाच्या असतील तर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करावा हा एकच उपाय आहे.

•बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानामध्ये समाजसुधारणा आहे हे माहीत झाले तर जगातील मानवाला बौद्ध धम्माविषयी आकर्षण वाटेल.

•भगवान बुद्ध जेवढे प्रज्ञावंत होते, त्यांच्या एका दशांशाने जरी आपण जागृत झालो तरी देखील करुणा, न्याक्ष व सदिच्छेने आपल्या हातुन जनहिताचे कार्य होईल.
•माझा सर्व बौद्ध जनांना असा सल्ला आहे कि त्यांना जगात सन्मानाने जगावयाचे असेल तर भगौआन बुद्धाच्या शिकवणुकीचा त्यांनी जास्तीत जास्त  अभ्यास करावा.

•धर्मरचाराचे कार्य करावयाचे असेल तर बुद्धाची शिकवण गोरगरीब लोकांच्या कानावर, मनावर सतत बिंबवली पाहिजे.

•आपण भगवान बुद्धाच्या धर्माचा विचार करु. भगवान बुद्धाने जगाला सर्वात श्रेष्ठ असे कोणते तत्त्व सांगितले असेल तर ते हे कि, मनाची स्वच्छता ठेवा. या द्येयाचे मनाची सुधारणा केल्याशिवाय जगाची अगर मानवाची सुद्धारणा होणार नाही.

•बौद्ध धर्म हा निव्वळ धर्मिक विधीचा धर्म नसुन समाजजीवनाचे तत्त्वज्ञान आहे.

•बुद्धाच्या शिकवणीनुसार वर्तन केल्यास आजचे सर्व सामाजिक प्रश्न चुटकीसरशी सोडविता येतील. बुद्ध धर्म हा नव्या जगाला सर्वतोपरी समर्थ बनवणारा असाच धर्म
आहे.

•बुद्धाव्यतिरिक्त सर्व धर्मसंस्थापकांनी आपण मोक्षदाते आहोत अशी भुमिका स्वीकारली; उलट बुद्धाने स्वतःला कोणतेही दैवी वलय न लावता मार्गदाता म्हणुन संबोधिले. बुद्धाचा धर्म हा नीतिधर्म आहे.

•भगवान बुद्धाने त्याचा शिष्य आनंद याला मृत्युपुर्वी केलेला उपदेश लक्षात ठेवावा असे म्हटले. हे आनंदा, तुम्हीच तुमचा प्रकाश व्हा. तुम्हीच तुम्हाला शरण जा. सत्य हाच तुमचा दीप आहे. स्वतःशिवाय दुसऱ्याकडे जाऊ नका.

•भगवान बुद्ध मुक्ती देण्याचे वचन देत नाहीत. ते म्हणतात की मी मार्गदाता, मार्गदर्शक आहे. मोक्षदाता नाही.

•माझ्या धम्माचा 'माणुस' हा केंद्रबिंदु आहे आणि या जगात माणसामाणसाशी त्यांच्या जीवनात नाते असणे ही केंद्रप्रवृत्ती आहे. ही भगवान बुद्धांची पहिली शिकवण होय.

•जातिभेदावर कुर्हाड घालुन अस्पृश्यतेचे पाप मुळातच मारुन टाकणारा जर एखादा धर्मवीर आपल्या देशात अवतरला असेल तर तो एकटा भगवान गौतम बुद्धच होय.

•जाती नाहीत, असमानता नाही, वरिष्ठपणा नाही, कनिष्ठपणा नाही. सर्व समान आहेत. हे भगवान बुद्धाचे तत्व आहे.

•धर्मांतर हे जबरदस्तीने किंवा सक्तीने करता येणे शक्य नाही. याबाबतीत भीड घालणे योग्य नाही व तिचा उपयोगही होणार नाही. धर्मांतर हे आपल्या मनाला पटले तरच करायचे असते.

•बौद्ध धर्माच्या शुद्ध तत्त्वांच्या बरोबरच ब्राह्मणी तत्वे वाहु देता कामा नये.

•माझी बौद्ध धर्माची कल्पना वेगळी आहे, या धर्मात वकील, बॅरिस्टर, प्रधान, मंत्री होतील अशी तरतुद हवी आहे.

•ज्याप्रमाणे ऊस हा मुळातच गोड असतो त्याचप्रमाणे बौद्ध धर्म सुरुवातीपासुनही कल्याणकारक आहे, मधेही कल्याणकारक आहे व शेवटीही कल्याणकारक आहे. या धर्माचा आदि, मध्य व अंत हे सर्वच गोड हितकारक व कल्याणकारी असे आहेत.

•आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्याचाराच्या जोरावर बौद्ध धर्माची लाट परतवुन लावली. परंतु आता मात्र बौद्ध धर्माची जी लाट येईल, ती कधीही परत
जाणार नाही. या अफाट सागराला भरती येईल पण ओहोटी कदापि येणार नाही.

•बौद्ध धर्म मला पटला व तो मी उचलला. राजकारणातील खोट्या निवडणुका मला नको आहेत. खोट्या निवडणुकांनी मी महामंत्री सुद्धा होऊ शकेन, पण हे मला नको आहे. राजकारण हा क्रिकेटसारखा खेळ नव्हे. तो एक संप्रदाय आहे. रामानंदी, कबीर पंथी माणसाला तु पंथ सोड असे सांगितल्याने तो आपला पंथ सोडणार नाही. त्याचप्रमाणे माझा बौद्ध धर्म देखील अटळ आहे. हा धर्म मी एकदा स्वीकारला, मग मला आता त्या मार्गानेच गेले पाहिजे.

•बुद्ध तत्त्वज्ञानाने सामाजिक, मानसिक व राजकीय क्रांती करुन शुद्रातिशुद्रांना उच्चपद प्राप्त करुन दिले होते. त्याकाळी अनेक शुद्र राजे झाल्याचे दाखले आहेत.

•बुद्धिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक वृत्तीच्या मनाला बुद्धाच्या धम्माइतका दुसरा कोणताच धर्मविचार आकर्षित करु शकत नाही.

•भगवान बुद्धांची शिकवण आणी सिद्धांत आधुनिक, बुद्धीसंगत व सदैव समकालीन आहेत, काहीच कट्टरपणा नाही. तुमचे जीवन विवेकपुर्ण असावे हिच बुद्धाची शिकवण आहे.

•जगाला भारताची आठवण म्हणजे गौतम बुद्धाची आठवण होय. भारत देश हा याच जगप्रसिद्ध पुरुषाची जन्मभुमी म्हणुन ओळखला जातो.

"जातींचा नाईनाट कसा होईल?"

"जातींचा नाईनाट कसा होईल "
Annihilation of caste


वर्णाश्रमासोबत हिंदूंना ब्राम्हणांनी दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे जात होय. भारतात एकूण ६५०० पेक्षा अधिक जाती असून त्यातही अस्पृश्यांच्या जवळपास १००० जाती आहेत.या जातीपैकी महाराष्ट्रात ५९ जाती आहेत. त्यात मुख्यता चार प्रमुख जाती आहेत. १) महार  २) चांभार  ३) मांग ४ ) भंगी / मेहतर. महाराचे प्रमाण हे राज्याच्या लोकसंख्येच्या ७ % आहे. ब्राम्हणांइतकेच या कनिष्ठ जातींवर अधिक हक्क गाजविणारे कुणबी, तेली, माळी आदी जाती आहेत. जातीच्या निर्मितीत जेव्हा शुद्र वर्णाच्या अन्यायाला चिडून प्रतीरोध दर्शविला गेला तेव्हा या विरोधी लोकांना शांत करण्यासाठी ब्राम्हणांनी जातीच्या सुधारणेत बदल करून या प्रतीरोधींना तेली, कुणबी, माळी आदी जातीत परावर्तीत केले. यां जातींना कनिष्ठ जातीवर वर्चस्व जरी दिल्या गेले तरी श्रेष्ठत्व मात्र ब्राम्हणांनी स्वत:च्याच अधिपत्यात ठेविले. आजही तेली, कुणबी स्वत:ला महार, मांग, चांभार, भंगी, मेहतर यांच्यापेक्षा श्रेष्ठ जातीचे समजतात आणि ब्राम्हणांईतकेच कनिष्ठ जातीवर अन्याय करण्यात पराक्रम दाखवितात, त्यांना हीन समजतात. ब्राम्हणांपेक्षाही ब्राम्हणेतर जाती त्यांच्या पेक्षा कनिष्ठ जातींवर अन्याय अत्याचार करतांना दिसून येतात.

             या देशाची मुख्य समस्या जर कोणती असेल तर ती जात आहे असे प्रतिपादित करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्माण होण्याची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यावर बाबासाहेबांनी Annihilation of caste  आणि  caste in india  ही पुस्तके लिहलीत. त्यावेळी जरी बाबसाहेबांच्या ‘जातीचा संपूर्ण नायनाट’ या मताला महत्व दिल्या गेले नसले तरी बाबासाहेबांनी केलेल्या अनेक भाकीतांपैकी, हे भाकीत सुद्धा आता सत्यात उतरले आहे. १९३६ ला त्यांच्या  Annihilation of Caste या पुस्तकाच्या दीड हजार प्रती काही अवघ्या दिवसातच खपल्या गेल्या होत्या हे मात्र विशेष.

             नुकताच भारताप्रती अमेरिकेने भारताचे सर्वेक्षण करून भारताची मुख्य समस्या जात (caste ) आहे असा अहवाला दिलाय. इतकेच नाही तर भारत कधीच विकसित राष्ट्र होणार नाही असेही या अहवालात दर्शविण्यात आले आहे. कारण भारतासमोर अनेक धर्म, धर्मातील जाती, भ्रष्टाचार, लोकसंख्यावाढ, आतंकवाद, बेकारी, गरीबी, निष्क्रीय जनता आणि त्यांचे सरकार, लोकांची अकार्यक्षमता, फालतुचे संस्कार, परंपरा, अनावश्यक संस्कृत्या, विभूतीपुजा देव आणि त्यांची देवळे, देशाप्रती असलेली अप्रामानिकता आदी प्रश्न आ वासून उभे आहेत. ज्या प्रश्नांवर बाबासाहेबांनी योग्य उपाययोजना देवूनही या प्रश्नांकडे कानाडोळा केल्यामुळे भारत अजूनही विकसनशील देश आहे. इतक्या समस्या असतांनीही भारत आज एकसंथ राहण्याचे मुख्य कारण भारताचे  ' संविधान ' आहे. भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी ,' भारत २०२० ला विकसित राष्ट्र होईल.' हे भाकीत कोणत्या तंद्रीत केले हे मात्र प्रश्नचिन्हच  आहे. ज्या देशातील समस्याचे अगोदर निराकरण होत नाही, उलट त्या वाढतच जात आहेत आहे तेथे कलामांचे हे भाकीत बिनबुडाचे आहे.

             भारतातील जातीचे आर्थिक दृष्टीकोनातून विश्लेषण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिलेच अर्थशास्त्रज्ञ होय. त्यांनी ठोसून सांगितले की, जातीव्यवस्थेत केवळ श्रमाचीच विभागणी झाली नाही तर त्यात श्रमिकांचीही विभागणी झाली. जगात कुठल्याही समाजात श्रमविभाजनाची अत्यंत अनैसर्गिक पंजीबद्ध करण्यात आलेल्या श्रमिकांच्या विभागणीची सांगड घातल्या गेली नाही.  जातीने श्रमिकांची श्रेष्ठ - कनिष्ठ वर्गात विभागणी केल्या गेली आहे. जसे लोहाराचा मुलगा लोहाराचेच काम करेल. सुताराचा मुलगा सुताराचेच काम करेल. या कनिष्ठ जातींना आर्थिक प्रगती वाढविण्याचा दुसरा कोणताही व्यवसाय करता येणार नाही. भारतातील बहिष्कृत समाजात आपोआप आर्थिक तफावत निर्माण झाली नाही तर ब्राम्हणांकडून ती हेतुपुरस्सर करण्यात आली. आज जर बहिष्कृत समाज हा ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य यांच्यापेक्षा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी दृष्ट्या मागासला असेल तर याला जात ( caste) जबाबदार आहे. जातीने  बहिष्कृत लोकांना अपमानजनक ओळख आणि अप्रगतीयुक्त काम दिले. (insulting identity & useless work)  जसे एखाद्या महाराच्या पोरात कितीही विद्वत्ता असली तरी त्याच्याकडे दुसऱ्यांचा बघण्याचा दृष्टीकोन एक महाराचं पोरच असेल. दुसरी गोष्ट त्याच्यात एका इंजिनीअरची जरी ऐपत असली  तरी त्याला वर्णाश्रमाने पाडून दिलेला नाल्या साफ करण्याचाच व्यवसाय करावा लागेल. भारतीय संविधानामुळे जरी बहिष्कृत लोकांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळाले असले तरी जोपर्यंत ते हिंदू धर्माच्या जातीत राहतील तोपर्यंत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे वर्णाश्रमाचेच आधिपत्य राहील. ही व्यावसायिक आणि शिक्षणिक मानसिकता हिंदू धर्मातून कधीच जाणार नाही.

           एक आर्थिक संस्था या दृष्टीने जात ही एक घातकी संस्था आहे. कारण तिच्यामध्ये माणसाची नैसर्गिक शक्ती आणि मनोवृत्ती सामाजिक नियमांच्या जकडीत गुदमरून जाते. जातीभेदाने श्रामाचीच विभागणी केली नाही तर तिने श्रमिकांचे वर्ग सुद्धा तयार केलेत. हे वर्ग पहिल्यावर दुसरा तर दुसऱ्यावर तिसरा याप्रमाणे जन्मजात प्रतवारी लावून देणारी संस्था आहे. दुसऱ्या कोणत्याही देशात श्रमविभाजनाला अशा तर्हेचा श्रमिकांचा दर्जा चिकटवून दिलेला नाही. एकप्रकारे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात दुसरे तिसरे काही नसून एका जातीची उत्पत्ती अत्यंत श्रेष्ठ तर दुसऱ्या जातीची उत्पत्ती निर्कृष्ठ असाच दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशातर्हेचा हिंदू समाज हा एक आदर्श समाज कधीच न ठरता तो अनेक शत्रूंचे असलेले एक विशाल घरच म्हणावे लागेल. ज्या घरातील प्रत्येक सदस्य स्वत:च्या स्वार्थी आदर्शासाठी जगतो. मोठे लहानांना तुडवीत असलेले, सशक्त अशक्तांना वरचढ होतांना, निर्दय लोक निर्भय झालेले, सद्गृहस्थ भ्याड झालेले आणि शहाण्यांना कशाचीच तमा नसलेले लोक या जातीच्या वर्गवारीमुळे हिंदू धर्मात निर्माण झालेत. सर्व सुधारणांना गावच्या वेशीवर टांगणाऱ्या जातीने सार्वजनिक हिताची वृत्ती सुद्धा ठार मारली. इतकेच नाही तर सार्वजनिक लोकमत सुद्धा जातीने मारले. जातीने संपूर्ण हिंदू धर्माच्या बहिष्कृत लोकांचे जीवन नरकमय करून टाकले. ज्याविरुद्ध एल्गार करण्याची एकाही गुणवान हिंदू पुढाऱ्याची हिंम्मत कधी झाली नाही. माणसाला नपुसकत्व देणाऱ्या या धर्माबद्दल बाबासाहेब म्हणतात, “ मुसलमान निर्दयी आहेत तर हिंदू नीच आहेत, आणि नीचपणा निर्दयीपणा पेक्षा अति वाईट आहे.” अशा हिंदू धर्माला आकर्षित होऊन जर कुणी हिंदू धर्म स्वीकारावा अशी इच्छा व्यक्त केली तर त्याला हिंदू धर्मातील कोणती जात मिळेल ? बहुतेक ब्राम्हण सोडून इतर वर्णात त्याचे स्थान निश्चित होईल. हिंदू समाज हा केवळ जातीचा संग्रह असल्यामुळे जात ही बंद असलेली संस्था असल्यामुळे हिंदू धर्मात मुस्लीमांसारखेच धर्मांतरीत माणसाला स्थान नाही. जोपर्यंत वर्ण आणि जाती जिवंत आहेत तोपर्यंत हिंदू धर्माचे बहिष्कृत वर्ग कधीच शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अविकसित असलेल्या गुलामीच्या बेड्या तोडू शकणार नाही. 
    
       डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात , "हिंदू समाज हा एक मनोरा आहे. या मनोऱ्याला शिडी नाही. त्यातील प्रत्येक जात म्हणजे इमारतीचा एक एक मजला आहे. खालच्या जातीतील लोकांना वरच्या जातीतील मजल्यात  प्रवेश नाही. खालच्या जातीतील माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या जातीत जाण्याचा मार्ग नाही तर वरच्या जातीतील मनुष्य कितीही नालायक असो त्याला खालच्या जातीच्या मजल्यात लोटून देण्याची क्षमता नाही. जातीच्या पायावर तुम्ही कोणतीही इमारत उभारू शकत नाही. तुम्ही राष्ट्राची उभारणी करू शकत नाही; तुम्ही नितीमत्तेची उभारणी करू शकत नाही. जातीच्या पायावर तुम्ही जे काही बांधाल ते कोसळून पडेल आणि एकसंघ कधीच होणार नाही.”

        जात अशी जी कधीच जात नाही. जात ती जी मुल जन्माच्या अगोदरच ठरल्या गेली आहे आणि मनुष्याच्या मृत्यूनंतरही ती पिढ्यानपिढ्या त्याला चिकटूनच असेल. मग त्याने त्याच्या आयुष्यात कितीही प्रगाढ समाजहित कार्ये केली असली तरी त्याच्या मृत्यूनंतरही  त्याला त्याच जातीने ओळखले जाईल. जो धर्मच स्वतंत्र, समता, बंधुता, न्यायावर आधारित नाही तो धर्म नसून घोड्याला आवरण्यासाठी खुट्याला बांधलेला निमुळत्या आकाराचा दोर आहे. घोडा तो दोर एका झटक्यात तोडू शकतो.पण त्याची मानसिक गुलामी त्याला त्या झटक्याने तोडणाऱ्या बलाचीही उर्जा देत नाही. अगदी तसेच हिंदू धर्माचेही आहे. ज्या जातीतून फक्त आणि फक्त गुलामीच निर्माण झाली. यावर एकमेव उपाय अशा जातीसंरचनेच्या धर्माचा त्याग करणे होय.डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  जातीच्या या अमानुष निर्मितीवर उपाय देतांनी त्यांच्या Annihilation of Caste या पुस्तकात म्हणतात, ” सर्वात पहिली आणि महत्वाची लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हिंदू समाज ही एक भाकड कथा आहे. जातीचे पालन करण्यात लोकांची चूक नाही. माझ्या मते जर चूक कोणती असेल तर त्यांचा धर्म. कारण त्यानेच जातींची कल्पना लोकांच्या मनावर बिंबविली आहे. हे जर खरे असेल तर ज्याच्याशी तुम्ही दोन हात करावेत असा तुमचा शत्रू जाती पाळणारे लोक नसून ज्या शास्त्रांनी लोकांना जातीधर्म शिकविला ती शास्त्रे तुमचा शत्रू होय हे उघड आहे. सहभोजनात भाग न घेणाऱ्या किंवा मिश्र विवाहास तयार न होणाऱ्या लोकांना शिव्या देऊन किंवा त्यांची टर उडवून काही फायदा होण्यासारखा नाही. तसेच प्रसंगपरत्वे सहभोजन घडविणे किंवा एखादा मिश्र विवाह समारंभ घडवून आणणे हे उपाय अपेक्षित ध्येयाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात. शास्त्रे पवित्र असल्याबद्दलची श्रद्धा नष्ट करणे हा त्यावरील खरा उपाय आहे. लोकांच्या मनावर अंधश्रद्धा बिंबविण्याचे व त्यांची मने घडविण्याचे शास्त्रांचे काम सुरू ठेवून तुम्ही यशाची आशा तरी कशी करू शकता? शास्त्राच्या अधिकाराला शह न देता, लोकांना शास्त्राच्या पवित्र्यावर विश्वास ठेवण्याची परवानगी देऊन केवळ लोकांना निर्दय व बुद्धिहीन म्हणणे हा समाज समाजसुधारणेचा अत्यंत भेकड असा मार्ग होय. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला शास्त्राच्या दास्यातून मुक्त करा, बुद्धाने जो पवित्र घेतला तोच तुम्हालाही घ्यावा लागेल. केवळ शास्त्रांना झुगारून तुमचा प्रश्न सुटणार नाही तर बुध्द आणि गुरुनानकांप्रमाणे तुम्हाला त्यांचे पवित्र्यही अमान्य करावे लागेल. *‘तुमच्यात जर काही घाणेरडे असेल तर तो तुमचा धर्म होय, या धर्मानेच तुमच्याच जातींच्या पवित्रपणाची भावना निर्माण केली’ असे सांगण्याचे तुम्ही धाडस दाखवाल काय ? म्हणूनच असा धर्म नष्ट केला पाहिजे, असे म्हणतांना मला मुळीच संकोच वाटत नाही. आणि मी तर असे म्हणतो की, असा धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आपण कोणताही अधर्म करीत नाही. खरेच, मी असे ठासून सांगतो की, या नियमांच्या जत्थ्यांच्या संग्रहाचा मुखवटा फोडून टाकणे, धर्माच्या नावाने घातलेला बुरखा फाडून त्याचे खरे स्वरूप उघड करणे तुमचे अटळ कर्तव्य आहे.” बाबासाहेबांच्या याच वक्तव्यावर जणू काय गांधी त्यांच्या ‘हरिजन’ वृत्तपत्रात बाबासाहेबांच्या Annihilation of Caste या पुस्तकावर टीका लिह्तांनी म्हणतात, “डॉ.आंबेडकर हे हिंदू धर्माला मिळालेले आव्हान आहे.” ( Dr,Ambedkar is challenge for Hinduism) 

      १९३६ च्या त्यांच्या जातीच्या या संशोधनावर आधारीत बाबासाहेब २० मे १९५१ दिल्ली येथील भाषणात म्हणतात, “ जर लोक पुन्हा बौध्द धर्माचा अंगीकार करतील तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्यावाचून राहणार नाही. एरव्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाने शक्य नाही. परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार करावा. हाच एकमेव उपाय आहे.”

         १९५६ पासून हिंदू धर्माचा त्याग करून ज्यांनी बौध्द धम्म अंगिकारला त्यांच्या जीवनात सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून आले आहे.  सुधारणेच्या प्रत्येक क्षेत्रात जात आडवी येत आहे. जोपर्यंत  विनाश होत नाही तोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक समता नाही. जात ही  हिंदू धर्माला मिळालेली ब्राम्हणांची एक महान अमानुष देन आहे. ज्यात विनाशाशिवाय दुसरे काहीच नाही. *जातीवर असा धर्म त्यागनेच हाच एकमेव उपाय जातीअंतावर आहे. याशिवाय जातीचा नाईनाट होण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही.

लेखक:- हर्षवर्धन ढोके

(लेख साभार :- ‘अंधश्रद्धेचा नायनाट’ या पुस्तकातून:- लेखक :- हर्षवर्धन ढोके )