Monday 15 February 2016

जिवाजी महार

" पैलवान जिवाजी महार "
उमरठ हे गाव तसं ३५० वर्षापूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तान्हाजीरावांचा.
आज गावाची यात्रा भरली होती.गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.
राजांची आणि तान्हाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची.मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.
आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची ,त्यांचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.
आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे..हा हिरडस मावळातला ..वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.
वास्तविक सर्वजन शिवाजी राजाना पाहायला जमणार होते, आणि का नाही जमणार.??
लेकीसुना, संत सज्जन ,गाइवसरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे .स्वराज्य आणले होते ..!
मैदान खचाखच भरले होते.लहान मोठ्या कुस्त्याला प्रारंभ झाला.
आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
राजीयानी पांढरा अंगरखा घातला होता..
कृष्णा घोडीवर स्वार होते,आणि कमरेला  तलवार बांधली होती..जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते.
राजे खाली उतरले ..
तान्हाजीराव आपल्या फौजेसह राजाना भेटायला वाटेतच थांबले होते.रजानी तान्हाजीरावना मिठी मारली.
तितक्यात खबर आली कि ,बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता .त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .
वाघाने त्यांच्या पायाला जबर दुखापत केली.
मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने .
हे ऐकून मैदान शांत झाले.खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन मैल आले होते.
आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते
'' मंडळी,लखू बेराडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.म्हणून तो आज लढू शकत नाही.
या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल.असेल तर समोर या.''
हि घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चीमेकडे कुजबुज सुरु झाली.
एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता.सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
राजे सर्व पाहत होते.
तितक्यात कोणतरी किंचाळला
''आरं आला रं जीवामहार आला ''
राजांनी चौकशी केली तान्हाजीरावान्पाशी ..
तान्हाजी म्हणाल..''राज ,ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय,कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा.दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होत..
निजामशाहीचा दंगा झाला तव ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला..तेनच याला तयार केलाय.""
राजांच्या चेहर्य्यावर एक तेज आले होते.
कुस्तीची सलामी झडली .
भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जीवाला नमवण्याचा प्रयत्न केला ,पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता.डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.
भिकाजी ने उसन्या अवसानान पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जीवा ने फिरवून बाहेरची टांग लावली...भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.
सगळ प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले.जीवाला अक्षरश डोक्यावर घेवून नाचू लागले
तितक्यात शिंगे -करणे गरजू लागली ..खुद्द राजे येत होते,
पटापटा सर्व बाजूला झाले.
राजीयानी हासत हासत जीवाला मिठीच मारली..मनात काय राजकारण होते माहित नव्हते मात्र राजे जाम खुश झाले होते..
राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जीवाला बक्षीस दिले..आणि विचारले..
जीव काय करतोस ??
जीव उद्गारला ,'' काय नाय वरातीत पट्टा फिरवतो..दंगलीत कुस्त्या खेळतो''
राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ...!!
पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमान्च्यासोबत..!!
आहे कबुल ..??
जीवा हासला...होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला.
आणि हाच तो जीवाजीराजे महार ज्याने अफजलखानाच्या अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला.
जिवाजी महार यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा ...!!!  
 
म्हणतात ना होते जीवाजी
                   म्हणून वाचले शिवाजी                                                                         
जय जिवाजी जय शिवाजी 

महात्मा फुले यांनी रचलेला छत्रपती शिवाजी राजे यांचा पोवाडा


छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा
कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||
लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा |
काळ तो असे यवनांचा ||
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा |
असे तो डौल जाहागिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळले |
जुन्नर तें उदयास आले ||
शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले |
जिजाबाईस रत्न सापडले ||
हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले |
ज्यांनी कमळा लाजविले ||
वर ख़ाली टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले |
स्पटिकापरी भासले ||
सानकटी सिंहापरी छाती मांस दुनावले |
नांव शिवाजी शोभले ||
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीले |
जसा का फणीवर डोले ||
एकसारखे शुभ्र दांत चमकू लागले |
मोती लडी गुंतविले ||
रक्‍तवर्ण नाजूक होटी हासू छपविले |
म्हणोन बोबडे बोल ||
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले |
विषादें म्रुग वनी गेले ||
नेत्र तिखे बाणी भवया कामठे ताणिले |
ज्यांनी चंद्रा हाटविले ||
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबले |
कुरळे केस मोघीले ||
आजानबाहू पायांपेक्षा हात लांबलेले |
चिन्ह गादिचे दिसले ||
जडावाची कडी तोडे सर्व अलंकार केले |
धाकट्या बाळा लेविवले ||
किनखांबी ठंकोचे मोती घोसाने जडले |
कलाबतुचे गोंडे शोभले ||
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले |
डाग लाळीचे पडलेले ||
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे |
पायी घुंगरू खुळखुळे ||
मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले |
ख़ेळण्यावर डोळे फिरविले ||
मजवर हा कसा ख़ेळणा नाही आवडले |
चिन्ह पाळणी दिसले ||
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले |
पाळण्या हालवू लागले ||
धन्य जिजाबाई जिने जो जो जो जो जो केले |
गातों गीत तिने केले ||
||चाल ||
जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जी गाऊं |
चला वेरूळांस जाऊ, दौलताबादा पाहू ||
मूळ बाबाजींस ध्याऊ, किर्ती आनंदाने गाऊ |
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधराऊ ||
पाटिल होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ |
थोर विठाजी नाव घेऊ, सान मालोजी त्याचा भाऊ |
दिपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं ||
|| चाल ||
मालोजी राजा | तुझा बा आजा ||
यवनी काजा | पाळिल्या फौजा ||
लाविल्या ध्वजा | मारिल्या मौजा ||
वेळेस मुक्का | साधल्या बुक्का ||
विचारी पक्का | जाधवा धक्का ||
शेशाप्पा नायका | ठेविचा पैका ||
द्रव्याची गर्दी | चांभारगोंदी ||
देवळे बांधी | तळी ती खांदी ||
आगळी बुध्दी | गुणाने निधि ||
लिहीले विधि | लोकांस बोधी ||
संधान साधी | जसा पारधी ||
भविषी भला | कळले त्याला ||
सांगोनी गेला | गादी बा तुला ||
उपाय नाही जाणोन चाकर झाला यवनाचा |
शिपाई होता बाणीचा ||
खोट्या दैवा कोण खोडी बेत देवाजीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा || १||

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले |
धाकट्यासवे ख़ेळले ||
उभयतांचे एकचित तालमीत गेले |
फरीगदग्या शिकले ||
आवडीने खमठोकी कुस्ती पेचाने खेळे |
पवित्र दस्तिचे केले ||
द्वादशवर्षी उमर आली नाही मन धाले |
घोडी फिरवू लागले ||
अट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शिकले |
गोळी निशाण साधले ||
कन्या वीर जाधवाची जिने भारथ लावले |
पुत्रा नीट ऐकविले ||
अल्पवयांचे असता शिकार करू लागले |
माते कौतुक वाटले ||
नित्य पतीचा आठव डोंगर दुखाःचे झाले |
घर सक्‍तिने घेतले |
छाती कोट करून सर्व होते साठविले|
मुखमुद्रेने फसविले ||
चतुर शिवाजीने आईचे दुःख ताडिले |
पित्यास मनी त्यागिले ||
पुत्राचे डोळे फिरले माते भय पडले |
हीत उपदेशा योजिले ||
मनी पतिभक्‍ती पुता बागेमधी नेले |
वृक्षाछायी बसविले ||
पुर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळिले |
नेत्री पाणी टपटपले ||
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले |
सांगते मुळी कसे झाले ||
क्षेत्रवासी म्हणोन नाव क्षत्रिय धरले |
क्षेत्री सुखी राहीले ||
अन्य देशिंचे दंगेखोर हिमालयी आले |
होते लपुन राहीले ||
पाठी शत्रुभौती झाडी किती उपासी मेले |
गोमांसा भाजून धाले ||
पाला फळे खात आखेर ताडपत्रा नेसले |
झाडी उल्लघून आले ||
लेखणीचा धड शीपाया सेनापती केले |
मुख्य ब्रम्हा नेमले ||
बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले |
कैदी सर्वास केले ||
सर्व देशी चाल त्याचे गुलाम बनविले |
डौलाने क्षुद्र म्हणाले ||
मुख्य राजा झाला ज्याने कायदे केले |
त्याचे पुढे भेद केले ||
ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले |
उरल्या क्षत्रिया पिडीले ||
माहारमांग झाले किती देशोधडी केले |
ब्राम्हण चिरंजीव झाले ||
देश निक्षत्रीय झाल्यामुळे यवना फावले |
सर्वास त्याही पिडीले ||
शुद्र म्हणती तुम्हा ह्रुदयी बाण टोचले |
आज बोधाया फावले ||
गाणे गाते ऐक बाळा तुझ्या आजोळी शिकले |
बोली नही मन धाले ||
||चाल ||
क्षेत्र क्षत्रियांचे घर,तुझे पित्रु महावीर |
सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचे माहेर||
शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ||
दरी खोरी वाहे नीर खळखळे निरंतर |
झाडा फुले झाला भार, सुगंधी वाहे लहर |
पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ||
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार |
भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीक फार ||
धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियांस मार |
दास केले निरंतर, ब्रम्हा झाला मनी गार ||
लोभी मेले येथे फार, विधवा झाल्या घरोघर |
उपाय नाही लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ||
दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर ||
मार त्याचा अनिवार, केला क्षत्रिया संव्हार ||
क्षत्रिय केले जरजर, भये कांपे थरथर |
दुःखा नाही त्यांच्या पार, ठाव नाही निराधार ||
बहू केले देशापार, बाकी राही मांगमाहार |
निक्षेत्री झाल्यावर, म्लेच्छे केले डोके वर ||
आले सिंधू नदीवर, स्वार्‍या केल्या वारोंवार |
गाते काटांवात सार, लक्ष देई अर्थावर ||
||चाल ||
काबुला सोडी | नदांत उडी ||
ठेवितो दाढी | हिंदूस पिडी ||
बामना बोडी | इंद्रिये तोडी ||
पीडिस फोडी | देऊळे पाडी ||
चित्रास तोडी | लेण्यास छेडी ||
गौमांसी गोडी | डुकरांसोडी ||
खंड्यास ताडी || जेजुरी गडी ||
भुंग्यास सोडी | खोडीस मोडी ||
मुर्तीस काढी | काबूला धाडी||
झादीस तोडी | लुटली खेडी ||
गडांस वेढी | लावली शिडी ||
हिंदूस झोडी | धर्मास खोडी ||
राज्यास बेडी | कातडी काढी ||
गर्दना मोडी | कैलासा धाडी ||
देऊळे फोडी | बांधीतो माडी ||
उडवी घोडी | कपाळा आढी ||
मीजास बडी | ताजीम खडी ||
बुरखा सोडी || पत्नीस पीडी ||
गायनी गोडी || थैलिते सोडी ||
माताबोध मनी ठसतां राग आला यवनांचा |
बेत मग केला लढण्याचा ||
तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा |
स्नेह यशाजी कंकाचा ||
मित्रा आधी ठेवी जमाव केला मावळ्याचा |
पूर करी हत्यारांचा ||
मोठ्या युक्‍तीने सर केला किल्ला तोरण्याचा |
रोविला झेंडा हिदूंचा ||
राजगड नवा बांधिला उंच डोंगराचा |
भ्याला मनी विजापूराचा ||
दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा |
दादोजी कोंडदेवाचा ||
मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी- भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||२||

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात |
चाकरी ठेवी लोकांस ||
थाप देऊन घेई चाकण किल्ल्यास |
मुख्य केले फिर्डोजीस ||
थोड्या लोकांसहीत छापा घाली सुप्यास |
कैद पाहा केले मामांस ||
सुप्या सोबत हाती घेतले तीनशे घोड्यास |
करामत केली रात्रीस ||
मुसलमानां लांच देई घेई कोडाण्यास |
सिंहगड नाव दिले त्यास ||
पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास |
कैद पाहा केले सर्वांस ||
गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस |
मारले नाही कोणास ||
वाटेमधी छापा घालून लूटी खजिन्यास |
साठवी राजगडांस||
राजमाची लोहगडी लढे घेई तिकोण्यास ||
बाकी चारा किल्ल्यास ||
मावळ्यांस धाढी कोकणी गाव लुटायांस |
धूर्त योजी फितुरास ||
सन्मान कैद्या देई पाठवी वीजापूरास |
मुलान्या सुभेदारांस ||
विजापूरी मुसलमाना झाला बहू त्रास |
योजना केली कपटांस ||
कर्नाटकी पत्र पाठवी बाजी घोरपड्यास |
कैद तुम्ही करां शहाजीस ||
भोजनांचे निमित्त केले नेले भोसल्यास |
दग्याने कैद केले त्यास ||
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास |
खुशी मग झाली यवनांस ||
चिरेबंदी कोठडीमध्ये बंद केले त्यास |
ठेविले भोक वार्‍यास ||
शाहाजीला पिडा दीली कळाले शिवाजीस |
ऐकून भ्याला बातमीस ||
पिताभक्‍ती मनी लागला शरण जायास |
विचारी आपल्या स्त्रियेस ||
साजे नाव सईबाई स्त्री सुचवी पतीस |
ताडा दंडी दुसमनास ||
स्त्रीची सुचना सत्य आसली लिहीले पत्रास |
पाठवी दिल्ली मोगलांस ||
चाकर झालो तुमचा आता येतो चाकरीस |
सोडवा माझ्या पित्यास ||
मोगल थैली गेली थेट मुसलमानास |
ठेविले किल्ल्यावर त्यास ||
बाजी शामराज का लाजला जात सांगायास |
धरू पाही शिवाजीस ||
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणांस |
आडचण झाली बखरीस ||
सिध्दीस बेत गेला नाही अंती भ्याला जिवास |
काळे केले महाडास ||
शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस |
हा पाजी मुकला जातीस ||
करनाटकी आज्ञा झाली शाहाजीस |
यवन भ्याला सिंहास ||
वर्षे चार झाली शिवला नाही कबजास |
पिताभक्‍ती पुत्रास ||
चंद्रराव मोर्‍यास मारी घेई जावळीस |
दुसरे वासोट्या किल्ल्यास ||
प्रतापगड बांधी पेशवा केला एकास |
नवे योजी हुद्यास ||
आपली बाकी काढी धाढी पत्र तगाद्यास |
चलाखी दावी मोगलांस ||
रात्री जाऊनी लुटी जुन्नरास |
पाठवी गडी लुटीस ||
आडमार्ग करी हळूच गेला नगरांस |
लुटी हत्तिघोड्यांस ||
उंच वस्त्रे, रत्ने होन कामती नाही द्रव्यास |
चाकरी ठेवी बारगिरास ||
समुद्रतिरी किल्ले घेई पाळी गलबतास |
चाकरी ठेवि पठाणास ||
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास |
उदासी लाभ शिवाजीस ||
आबजूलखान शूर पठाण आला वाईस |
शोभला मोठा फौजेस ||
हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस |
कमी नाही दारूगोळिस ||
कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षिस |
फितवीले लोभी ब्राम्हणास ||
गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास |
चुकला नाही संकेतास ||
माते पायी डोई ठेवी, लपवी हत्यारास |
बरोबर आला बेतास ||
समीप येता शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास |
कमी करी आपल्या चालीस ||
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनांस |
भ्याला तुमच्या शिपायांस ||
त्या अधमांचे एकून शिपाई केला बाजूस |
लागला भेटू शिवाजीस ||
वर भेटभाव वाघनख मारी पोटास |
भयभित केले पठाणास ||
पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस |
झोंबती एकमेकांत ||
हातचलाखी केली विंचवा मारी शत्रूस |
पठाण मुकला प्राणास ||
स्वामीभक्‍ती धाव घेई कळले शिपायास |
राहिला उभा लढण्यास ||
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास |
तान्हाजी भिडे बाजूस ||
दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास |
घाबरे केले दोघांस ||
नाव सय्यद बंडू साजे शोभा आणी बखरीस |
लाथाळी जीवदानास ||
तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस |
न्याहाळी प्रेती धन्यास ||
उभयतांसी लढता मुकला आपल्या प्राणास |
गेला जन्नत स्वर्गास ||
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस |
पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ||
चार हजार घोडा लूट कमी नाही द्रव्यास |
दुसर्‍या सरंजामास ||
अलंकार वस्त्रे देई सर्व कैदी जखम्यास |
पाठवि विजापूरास ||
वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षीस |
फितुर्‍या गोपीनाथास ||
नाचत गात सर्व गेले प्रतापगडास|
उपमा नाही आनंदास || ||चाल ||
|| शिवाचा गजर जयनामाच झेंडा रोविला ||
||क्षेत्र्याचा मेळा मावळ्यांचा शिकार ख़ेळला ||
माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा |
आर्शिवाद घेई आईचा ||
आलाबला घेई आवडता होता जिजीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||३||

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास |
केले मग सुरू खंडणीस ||
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास |
नेमिला कोल्हापुरास |
स्वार तिन हजार घेई थोड्या पायदळास |
आला थेट पन्हाळ्यास ||
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस |
अति जेर केले त्यास |
खंडणी घेत गेला भिडला विजापुरास |
परत मग आला गडास ||
राजापुर दाभोळ लूटी भरी खजिन्यास |
मात गेली विजापुरास ||
सिध्दीजोहरा नेमी मोठी फौज दिमतीस |
सावंत सिद्दी कुमकेस ||
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास |
करी मग जमा बेगमीस ||
वारंवार छापे घाली लुटी भौती मुलखास |
केले महाग दाण्यास ||
त्रासाने खवळून वेढा घाली शिवाजीस |
कोंडिले गडी फौजेस ||
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढ्यास |
योजनां करी उपायास ||
कोकणांमधी सिध्दी झोडी रघुनाथास|
उपद्रव झाला रयतेस ||
पासलकर बाजीराव पडाले वाडीस |
दुःख मग झाले शिवाजीस ||
सिध्दी जोहरा निरोपाने गोवीं वचनास |
खुशाल गेला भेटीस||
वेळ करून गेला उरला नाही आवकास |
कच्चा मग ठेवी तहास ||
सिद्दिस लाडी गोडी मधी मान डुकलीस |
गेला थाप देऊन गडास ||
सिद्द्या पोटी खुष्याली जाई झोपी सावकाश |
हयगय झाली जप्तीस ||
तो शिवाजी पळून गेला घेई पाथी रात्रीस |
सविले मुसलमानांस ||
सिद्दि सकाळी खाई मनी लाडू चुरमुर्‍यास |
स्वारदळ लावी पाठीस ||
चढत होता खिंड शिवाजी गांठले त्यांस |
बंदुका लावी छातीस |
बाजीप्रभु मुख्य केला ठेवि मावळ्यास |
एकटा गेला रांगण्यास ||
स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रुस |
हरवी नित्य मोगलास ||
दोन प्रहर लढे वाट दिली नाही त्यास|
धन्य त्याच्या जातीस ||
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास |
खवळला बाजी युध्दास ||
अर्धे लोक उरले सरला नाही पाउलास |
पडला प्रभू भूमीस ||
तो शिवाजी सुखी पोहचला कान सुचनेस |
अंती मनी हाच ध्यास ||
बार गडी ऐकून सुखी म्हणे आपल्यास |
निघून गेला स्वर्गास ||
सय्यद मागे सरे जागा देई बाजीरावास |
पाहून स्वामीभक्‍तीस ||
विजापुरी मुसलमान करी तयारीस |
खासा आला लढण्यास ||
कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस |
वश करी चाचे लोकांस ||
दळव्यासी लढून घेई श्रुंगारपुरास |
मारले पाळेगारांस ||
लोकप्रितीकरीता करी गुरू रामदासास |
राजगडी स्थापी देवीस ||
मिष्ट अन्नभोजन दिले सर्वा बक्षिस |
केली मग मोठी मजलस ||
तानसैनी भले गवय्या बसवी गायास |
कमी नाही तालस्वरास ||
||चाल ||
जीधर उधर मुसलमानी | बीसमिलाहि हिमानी ||
सचा हरामी शैतान आया | औरंगजीब नाम लिया ||
छोटे भाईकू हूल दिया | बडे भाईकी जान लिया ||
छोटे कूंबी कैद किया | लोक उसके फितालीया ||
मजला भाई भगादिया | आराकानमे मारा गया ||
सगे बापकूं कैद किया | हुकमत सारी छिनलीया ||
भाईबंदकू कैद किया | रयत सब ताराज किया ||
मार देके जेर किया | खाया पिया रंग उडाया ||
आपण होके बेलगामी | शिवाजीकू कहे गुलामी ||
आपण होके ऐषारामी | शिवाजीकू कहे हरामी ||
बेर हुवा करो सलामी | हिंदवाणी गाव नाभी ||
||चाल ||
आदी आंतन | सर्वा कारण ||
जन्ममरण | घाली वैरण ||
तोच तारण | तोच मारण ||
सर्व जपून | करी चाळण ||
नित्य पाळण | लावी वळण ||
भूती पाहून | मनी ध्याईन ||
नाव देऊन | जगज्जीवन ||
सम होऊन | करा शोधन ||
सार घेऊन | तोडा बंधन ||
सरनौबती डंका हुकूम पालेकराचा | घेई मुजरा शाई(रा)चा ||
सुखसोहळे होता तरफडे सावंत वाडीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा || ४||

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास |
मागे फौज कुमकेस ||
बाजी घोरपडा बल्लोळखान येती सहाय्यास |
शिवाजी करी तयारीस ||
खरा करून गेला छापा घाली मुधोळास |
मारिले बाजी घोरपड्यास ||
भाऊबंद मारिले बाकी शिपाई लोकांस |
घेतले बापसूडास ||
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस |
धमकी देई पोर्तुगीस ||
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस ||
बांधिले नव्या जहाजास |
जळी सैनापती केले ज्यास भिती पोर्तुगीस |
शोभला हुद्दा भंडार्‍यास ||
विजापुरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस |
उभयता आणिले एकीस ||
व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस |
शिवाजी लागे चरणास ||
शाहाजीचे सदगुण गाया नाही आवाकाश |
थोडेसे गाऊ अखेरीस ||
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास |
उणे स्वर्गी सुखास ||
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास |
भेट मग देई यवनास ||
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊन लक्षास |
साजे यवनी स्नेहास ||
विजापुरचा स्नेह होता लढे मोगलास |
घेतले बहूता किल्ल्यास ||
सर्व प्रांती लूट धूमाळी आणिले जेरीस |
घाबरे केले सर्वांस ||
संतापाने मोगल नेमी शाइस्तेखानेस |
जलदि केली घेई पुण्यास ||
चाकणास जाऊन दावी भय फिर्डोजीस |
फुकट मागे किल्ल्यास ||
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस |
खान खाई मनास ||
आखेर दारू घालून उडवी एका हुकूमास |
भीति आंतल्या मर्दास ||
लागोपाठ मार देत हटवि पठाणास |
खचला खान हिंमतीस ||
प्रातःकाळी संतोषाने खाली केले किल्ल्यास |
देई मुसलमानास ||
फिर्डोजीला भेट देता खुषी झाली यवनास |
देऊन मान सोडी सर्वास ||
शिवाजीची भेट देता खुषी झाली यवनास |
वाढवी मोठ्या पदवीस ||
फिर्डोजीचे नाव घेता मनी होतो उल्हास |
पीढिजाद चाकरीस ||
येशवंतसिंग आले घेऊन मोठ्या फौजेस |
मदत शाईस्तेखानेस ||
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास |
जाळून पाडिला ओस ||
पाठी लागून मोंगल मारी त्याच्या स्वारांस |
जखमा केल्या नेताजीस ||
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास |
पाहून मोगलसेनेस ||
जिजीबाईचे मुळचे घर होते पुण्यास |
खान राही तेथे वस्तीस ||
मराठ्यास चौकी बंदी गावात शिरण्यास |
होता, भित शिवाजीस ||
लग्नवर्‍हाडी घुसे केला पुण्यात प्रवेश |
मावळे सोबत पंचवीस ||
माडिवर जाऊन फोडी एका खिडकीस |
कळाले घरांत स्त्रीयांस ||
शाइस्त्यास कळता दोर लावी कठड्यास |
लागला खाली जायास ||
शिवाजीने जलदी गाठून वार केला त्यास |
तोडिले एका बोटास ||
स्त्रिपुत्रा सोडून पळे पाठ दिली शत्रूस |
भित्रा जपला जिवास ||
आपल्या पाठिस देणे उणे शिपायगिरीस |
उपमा नाही हिजड्यास ||
सर्व लोकांसहीत मारीले खानपुत्रास |
परतला सिंहगडास |
डौलाने मोगल भौती फिरवी तरवारीस |
दावी भय शिवाजीस ||
समीप येऊ दिले हुकूम सरबत्तीस |
शत्रू पळाला भिऊन मारास ||
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास |
मुख्य केले माजमास ||
राजापुरी जाई शिवाजी जमवी फौजेस |
दावी भय पोर्तुगास ||
सर्व तयारी केली निघाला नाशिक तिर्थास |
हुल कसी दिली सर्वास ||
मध्यरात्री घेई बरोबर थोड्या स्वारांस |
दाखल झालो सुर्तेस ||
यथासांग सहा दिवस लुटी शहरास |
सुखी मग गेला गडास ||
बेदनूराहून पत्र आले देई वाचायास |
आपण बसे ऐकायास ||
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस |
लागले हरणापाठीस ||
घोड्या ठेंच लागे उभयता आले जमीनीस |
शाहाजी मुकला प्राणास ||
पती कैलासा गेले कळाले जिजीबाईस |
पार मग नाही दुःखास ||
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस |
घेई पुढे शिवाजीस ||
||चाल ||
अतिरूपवान बहु आगळा | जैसा रेखला चित्री पूतळा ||
सवतीवर लोटती बाळा |
डाग लाविला कुणबी कुळा ||
सवतीला कसे तरी टाळा |
कज्जा काढला पती मोकळा ||
खर्‍या केसाने कापि का गळा |
नादी लागला शब्द कोकीळा || मुख दुर्बळ राही वेगळा |
अती पिकला चिंतेचा मळा ||
झाला शाहाजी होता सोहळा |
मनी भूलला पाहूनी चाळा ||
बहुचका घेती जपमाळा |
जाती देऊळा दाविती मोळा ||
थाट चकपाक नाटक शाळा | होती कोमळा जशा निर्मळा ||
खर्‍या डंखिणी घाली वेटोळा |
विषचुंबनी देती गरळा ||
झाला संसारी अती घोटाळा |
करी कंटाळा आठी कपाळा ||
मनी भिऊन पित्याच्या कुळा |
पळ काढला गेले मुताळा ||
छातीवरी ठेवल्या शिळा |
नाही रुचला सवत सोहळा ||
कमानीवर | लावले तीर ||
नेत्रकटार | मारी कठोर ||
सवदागर | प्रीत व्यापार ||
लावला घोर | सांगते सार ||
शिपाई शूर | जुना चाकर ||
मोडक्या धीर | राखी नगर ||
आमदानगर | विजापूरकर ||
मंत्रि मुरार | घेई विचार ||
वेळनुसार | देई उत्तर ||
धूर्त चतुर | लढला फार ||
छाती करार | करी फीतूर ||
गुणगंभीर | लाविला नीर ||
होता लायक | पुंडनायक ||
स्वामीसेवक | खरा भाविक ||
सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा |
बजावला धर्म पुत्राचा ||
रायगडी जाई राही शोक करी पित्याचा |
शत्रु होता आळसाचा ||
दुःखामधी सुख बंदोबस्त करी राज्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||५||

सर्व तयारी केली राजपद जोडी नावास |
शिक्का सुरू मोर्तबास ||
अमदानगरी नटून फस्त केले पेठेस |
भौती औरंगाबादेस ||
विजापूरची फौज करी बहुत आयास |
घेई कोकणपटीस ||
सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस |
ठोकून घेई सर्वास ||
जळी फौज लढे भौती मारी गलबतास |
दरारा धाडी मक्केस ||
मालवणी घेऊन गेला अवचित फौजेस |
पुकारा घेतो मोगलास ||
जहाजावर चढवी फौज गेला गोव्यास |
लुटले बारशिलोरास ||
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास |
लुटले मोगल पेठांस ||
पायवाटेने फौज पाठवी बाकी लुटिस |
आज्ञा जावे रायगडास ||
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जहाजास |
निघाला मुलखी जायास ||
मोठा वारा सुटला भ्याला नाही तुफानास |
लागले अखेर कडेस ||
औरंगजेब पाठवी राजा जयशिंगास |
दुसरे दिलीरखानास ||
ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास |
वेढिले बहुता किल्ल्यास ||
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस |
सुचेना काही कोणास ||
बाजी प्रभू भ्याला नाही दिलीरखानास |
सोडिले नाही धैर्यास ||
हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस |
संभाळी पुरंधरास ||
चार्तुयाने लढे गुंतवी मोगल फौजेस |
फु्रसत दिली शिवाजीस ||
फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस |
भिडला किल्ला माचीस ||
बुर्जाखाली गेला लागे सुरंग पाडण्यास |
योजी अखेर उपायास ||
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास |
पिडीले फार मोगलास ||
मोगलाने श्रम केले बेत नेला सिध्दिस |
काबीज केले माचीस ||
यशस्वी भासले लागले निर्भय लुटीस |
चुकले सावधपणास ||
हेटकर्‍यांचा थाट नीट मारी लुटार्‍यास |
मोगल हटले नेटास ||
बाजी मावळ्या जमवी हाती घेई खांड्यास |
भिडून मारी मोगलांस ||
पळ काढी पाठ दिली मावळ्यास |
मर्द पाहा भ्याले उंदरास ||
लाजे मनी दिलीरखान जमवी फौजेस |
धीर काय देई पठाणास ||
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास |
जाऊन भिडला मावळ्यास ||
बाजी मार देई पठाण खचले हिंमतीस |
हटती पाहून मर्दास ||
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास |
लावीला तीर कमानीस ||
नेमाने तीर मारी मुख्य बाजी प्रभुस |
पाडिला गबरू धरणीस ||
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस |
सरले बालेकिल्ल्यास ||
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस |
धमकी देती मावळ्यास ||
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस |
पळवी इशानी कोणास ||
वज्रगडाला शिडी लावली आहे बाजूस |
वरती चढवी तोफांस ||
वरती मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास |
आणले बहु खराबीस ||
हेटकरी मारी गोळे बालेकिल्ल्यास |
आणले बहु खराबीस ||
हेटकरी मावळे भ्याले नाही भडिमारास |
मोगल भ्याला पाऊसाअ ||
मोगल सल्ल करी शिवाजी नेती मदतनीस |
घेती यवनी मुलखास ||
कुलद्रोही औरंगजेब योजी कपटास |
पाठवी थैली शिवाजीस ||
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस |
नजरकैद करी त्यास ||
धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस |
ठेविले जवळ पुत्रास ||
दरबार्‍या घरी जाई देई रत्न भेटीस |
जोडीला स्नेह सर्वास ||
दुखणे बहाणा करी पैसा भरी हाकीमास |
गूल पाहा औरंगजेबास ||
आराम करून दावी सुरू दानधर्मास | देई खाने फकीरास ||
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदिस |
जसा का मुकला जगास ||
दानशूर बनला हटवी हातिमताईस |
चुकेना नित्यनेमास ||
औरंगजेबा भूल पडली पाहून वृत्तीस | विसरला नीट जप्तीस ||
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास | चढला मोठ्या दिमाखास ||
पितापुत्र निजती टोकरी बदली रोटांस |
बाकी सोपी चाकरास ||
जलदी करीती चाकर नेती टोकरांस | करामत केली रात्रीस ||
दिल्ली बाहेर गेले खुले केले शिवाजीस |
नेली युक्‍ती सिध्दीस ||
मोगल सकाळी विचकरी दांत खाई होटांस |
लावि पाठी माजमास ||
|| चाल ||
औरंगजेबीचा धूर दीला | पुत्रासवे घोडा चढला ||
मधीच ठेवी पुत्राला | स्वताः गोसावी नटला ||
रात्रीचा दिवस केला | गाठले रायगडाला ||
माते चरणी लागला | हळूच फोडी शत्रूला ||
स्नेह मोगलांचा केला | दरारा देई सर्वाला ||
||चाल ||
हैद्राबादकर | विजापूरकर ||
कापे थरथर | देती कारभार ||
भरी कचेरी | बसे विचारी ||
कायदे करी | नीट लष्करी ||
शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा |
बंदोबस्त केला किल्ल्याचा ||
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्‍याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||६||

शिवाजी तो मसलत देई मित्र तान्हाजीला |
बेत छाप्याचा सुचवीला ||
तान्हाजीने भाऊ धाकटा सोबत घेतला |
मावळी हजार फौजेला ||
सुन्या रात्री सिंहगड पायी जाऊन ठेपला |
योजिले दोर शिडिला ||
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला |
हळूच वर चढवीला ||
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला |
करी तयार लोकाला ||
थोड्या लोकांसवे तान्हाजी त्यावर पडला |
घाबरा गढकरी केला ||
रणी तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला |
सुर्याजी येऊन ठेपला |
धीर मोडक्या देई परत नेई सर्वाला |
उगवी बंधु सुडाला ||
उदेबान मारिला बाकिच्या रजपुताला |
घेतले सिंहगडाला ||
गढ हाती लागला तान्हाजी बळी घेतला |
झाले दुःख शिवाजीला ||
संहगडी मुख्य केले धाकट्या सुर्याजीला |
रुप्याची कडी मावळ्याला ||
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला |
पिडा जंजिरी सिद्द्याला ||
सुरत पुन्हा लुटी मार्गी झाडी मोगलाला |
मोगल जेरदस्त केला ||
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला |
त्यामधी अनेक स्त्रियांला ||
सुंदर स्त्रिया परत पाठवी ख़ानदेशाला |
सुरू केले चौथाईला ||
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला |
देई मोठ्या फौजेला ||
औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला |
धिंगाणा दक्षिणेत केला ||
गुजर उडी घाली सामना शत्रुचा केला |
मोरोबा पठाण पंक्‍तीला ||
लढता पळ काढी दावी भ्याला मोगलाला |
जसा खरा मोड झाला ||
तो मराठे पळती मोगल गर्वाने फुगला |
आळसाने ढिला पडला ||
गुजर संधी पाहून परत मुरडला |
चुराडा मोगलाचा केला ||
बेवीस उमराव पाडले रणभूमीला |
नाही गणती शिपायाला ||
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्याला |
पाठवी रायगडाला ||
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला |
खिदाडी औरंगाबादेला ||
रायगडी नित्य शिवाजी घेई खबरीला |
गोडबोल्या गोवी ममतेला ||
एकसारखे औषध पाणी देई सर्वाला |
निवडले नाही शत्रूला ||
जखमा बर्‍या होता खुलासा सर्वांचा केला |
राहिले ठेवी चाकरीला ||
शिवाजीचू किर्ती चौमुलखी डंका वाजला |

शिवाजी धनी आवडला ||
मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला |
हाजरी देती शिवाजीला ||
पोर्तुग्यास धमकीही देई मागे खंडणीला |
बंदरी किल्ला वेढीला ||
मधीच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला |
बनया धर्मा आड झाला ||
दिल्लीस परत नेले सुलतान माजूमाला |
दुजे मोहबतखानाला ||
उभयतांचा बदली खानजहान आला |

मुख्य दक्षीणेचा केला ||
मोगलाला धूर देऊन लुटले मुलखाला |
गोवळकुंडी उगवला ||
मोठी खंडणी घेई धाकरी धरी निजामाला |
सुखे मग रायगडी गेला ||
मोगलाचे मुलखी धाडी स्वार लुटायाला |
लुटले हुबळी शहराला ||
समुद्रकाठी गावे घेई जाहाजाला |
केले खुले देसाईला ||
परळी सातारा किल्ले घेई पांडवगडला |
आणिक चार किल्ल्यांला ||
|| चाल ||
हुकूम विजापुरी झाला | सोडिले बहुत फौजेला ||
द्यावा त्रास शिवाजीला | घ्यावे त्याचे मुलखाला ||
शिवाजी सोडी गुजराला | कोंडी आबदुल करीमाला ||
केला महाग दाण्याला | शत्रू अती जेर केला ||
आर्जव करणे शिकला | भोंदिले सैनापतीला ||
निघून विजापुरी गेला | क्रोध शिवाजीस आला ||
रागाऊन लिहीले पत्राला | निषेधी प्रतापरावाला ||
गुजर मनात लाजला | निघून वर्‍हाडात गेला ||
||चाल ||
आबदुल्याने | बेशर्म्याने ||
फौज घेऊन | आला निघून ||
राव प्रताप | झाला संताप ||
आला घाईने | गाथी बेताने ||
घुसे स्वताने | लढे त्वेषाने ||
घेई घालून | गेला मरून ||
प्रतापराव पडता मोड फौजेचा झाला |
पाठलाग मराठ्यांचा केला ||
तोफ गोळ्या पोटी पोटी दडती भिडती पन्हाळ्याला |
गेले नाही शरण शत्रूला ||
अकस्मात हंसाजी मोहीता प्रसंगी आला |
हल्ला शत्रूवर केला ||
गुजर दळ मागे फिरून मारी यवनाला |
पळिवले विजापुरला ||
शिवाजीने हंसाजीला सरनौबत केला |
शिवाजी मनी सुखी झाला ||
सेनापतीचे गुण मागे नाही विसरला |
पोशी सर्व कुटूंबाला ||
प्रतापराव – कन्या सून केली आपल्याला |
व्याही केले गुजराला ||
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा |
केला खेळ गारूड्याचा ||
लुटारू शिवाजी लुटला धाक गृहफौजेचा |
खर्च नको दारूगोळीचा ||
बहुरूपी सोंग तूलदान सोने घेण्याचा |
पवाडा गातो भोसल्याचा ||
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||७||

विश्वासू चाकर नेमी मुलखी लुटायाला |
शिवाजी कोकणांत ||
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला |
जमाव फौजेचा केला ||
गोवळकुंडी जाई मागून घेई तोफाला |
फितीवले कसे निजामाला ||
करनाटकी गेला भेटे सावत्रभावाला |
वाटणी मागे व्यंकोजीला ||
लोभी व्यंकोजी हिस्सा देईन बळासी आला |
आशेने फिरवी पगडीला ||
बंधू आज्ञा मोडून गर्वाने हट्टी पेटला |
बिर्‍हाडी रागाऊन गेला ||
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला |
कैदी नाही केले भावाला ||
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला |
खडा कानाला लावला ||
दासीपुत्र संताजी बंधू होता शिवाजीला |
करनाटकी मुख्य केला ||
हंबीरराव सेनापती हाताखाली दिला |
निघाला परत मुलखाला ||
वाटेमध्ये लधून घेई बिलरी किल्ल्याला |
तेथे ठेवी सुमंताला ||
शिवाजीचे मागे व्यंकोजीने छापा घातला |
घेतले स्वःता अपेशाला ||
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला |
शिवाजी रायगडी गेला ||
विजापूराचा साह्य नेई राजे शिवाजीला |
मोगल मुलखी सोडला ||
मुलखी धिंगाणा धुळीस डेश मिळवीला |
सोडिला नाही पिराला ||
वाटेमधी मोगल गाठी शिवाजीला |
ग़्हाबरा अतिशय केला ||
भिडला शिवाजी मोगल मागे हाटीवला |
वाट पुढे चालू लागला ||
दुसरी फौज आडवी माहारज राजाला |
थोडेसे तोंड दिले तिजला ||
काळ्या रात्री हळूच सुधरी आडमार्गाला |
धूळ नाही दिसली शत्रूला ||
फौजसुध्दा पोहचला पटा किल्ल्याला |
फसविले आयदी मोगलाला ||
विजापुरचा आर्जव करी धडी थैलीला |
आश्रय मागे शिवाजीला ||
हांबीरराव मदत पाठवी विजापुरला |
बरोबर देई फौजेला ||
नऊ हजार मोगलांचा पराभव केला |
ज्यानी मार्ग अडीवला ||
विजापुरी जाऊन जेर केले मोगलाला |
केला महाग दाण्याला ||
शत्रुला पिडा होता त्रासून वेढा काढला |
मोगल भिऊन पळाला ||
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला |
पाठवी शाहजहानाला ||
जलदी करून शिवाजी वळवी पुत्राला |
लाविला नीट मार्गाला ||
तह करून शिवाजी नेती विजापुरला |
यवन घेती मसलतीला ||
शिवाजीचे सोवळे रुचले नाही भावाला |
व्यंकोजी मनी दचकला ||
निरस मनी होऊन त्यागी सर्व कामाला |
निरा संन्यासी बनला ||
शिवाजीने पत्र लिहीले बंधु व्यंकोजीला |
लिहीतो पत्र अर्थाला ||
वीरपुत्र म्हणविता गोसावी कसे बनला |
हिरा का भ्याला कसाला ||
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला |
मळावाचून काटला ||
कनिष्ठ बंधु माझ्या लाडकी पाठी साह्याला |
तुम्ही का मजवर रुसला ||
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला |
त्यागा ढोंगतोर्‍याला ||
मन उत्तम कामी जपा आपल्या फौजेला |
संभाळा मुळ आब्रुला ||
किर्ती तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला |
नित्य जपतो या जपाला ||
कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला |
सोड मनच्या आधीला ||
सुबोधाचे पत्र ऐकता शुध्दीवर आला |
व्यंकोजी लागे कामाला ||
शिवाजीला रायगडी गुडघी रोग झाला |
रोगाने अती जेर केल ||
त्याचे योगे नष्ट ज्वर फारच खवळला |
शिवाजी सिसी दुःखाला ||
यवनी विरास भिडता नाही कुचमला |
शिवाजी रोगाला भ्याला ||
सतत सहा दिवस सोसी तापदहाला |
नाही जरा बरळला ||
सातव्या दिवशी शिवाजी करी तयारीला |
एकटा पुढे आपण झाला ||
काळाला हूल देऊन स्वःता गेला स्वर्गाला |
पडले सुख यवनाला ||
कुळवाडी मनी खचले करती शोकाला |
रडून गाती गुणाला ||
||चाल ||
महाराज आम्हांसी बोला | धरल का तुम्ही आबोला ||
मावळे गडी सोबतीला | शिपाई केले उघड्याला ||
सोसिले उन्हातान्हाला | भ्याला नाही पावसाला ||
दोंगर कंगर फिरला | यवन जेरीस आणला ||
लुटले बहूत देशांला | वाढवी आपुल्या जातीला ||
लढवी अचाट बुध्दीला | आचंबा भुमीवर केला ||
बाळगी जरी संपत्तीला | तरी बेताने खर्च केला ||
वाटणी देई शिपायाला | लोभ द्रव्याचा नाही केला ||
चतुर सावधपणाला | सोडिले सोडिले आधी आळसाला ||
लहान मोठ्या पागेला | नाही कधी विसरला ||
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला | नाही दुसरा उपमेला ||
कमी नाही कारस्तानीला | हळूच वळवी लोकांला ||
युक्‍तीने बचवी जीवाला | कधी भिईना संकटाला ||
चोरघर्ती घेई किल्ल्याला | तसेच बाकी मुलखाला ||
पहिला झटे फितुराला | आखेर करी लाढाईला ||
युध्दी नाही विसरला | लावी जीव रयतेला ||
टळेना रयत सुखाला | बनवी नव्या कायद्याला ||
दाद घेई लहानसानाची | हयगय नव्हती कोणाची ||
आकृती वामनमुर्तीची | वळापेक्षा चपळाईची ||
सुरेख ठेवण चेहर्‍याची | कोंदिली मुद्रा गुणरत्नाची ||
||चाल ||
भिडस्त भारी | साबडा घरी ||
प्रिय मधुरी | भाषण करी ||
मोठा विचारी | वर्चड करी ||
आस सोयरी | ठेवी पदरी ||
लाडावरी | रागाचे भारी ||
इंग्लीश ज्ञान होता म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा |
उडवी फट्टा ब्रम्हाचा ||
जोतिराव फु्ल्याने गाईला पुत क्षुद्राचा |
मुख्य धनी पेशव्याचा ||
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||८||

"" योद्धा महार""

महार ही जात प्राचीन काळापासूनच लढवय्यी, शूरवीर, कर्तबगार, पराक्रमी आहे. त्यांची पराक्रम बघून भल्याभल्यांचा थरकाप उडायचा म्हणूनच प्राचीनकाळी त्यांना महा + अरि म्हणजे मोठा शत्रू अशा विशेषणाने संबोधले जायचे पुढे या विशेषणाचा अपभ्रंश होऊन महार झाले. त्यांच्या या पराक्रमी वृत्तीमुळे कालांतराने त्यांच्यावर अंकुश असावा म्हणून धर्माच्या नावाखाली सामाजिक बंधणे घालून, अन्याय करून शक्तिहीन करण्याचे प्रयत्न केले गेले.
अलिकडच्या इतिहासात पाहले तर शिवरायांचे काळा महारांनी अनेक लढायात पराक्रम करून स्वराज्याच्या स्थापनेत आपले भरीव योगदान दिले होते.
शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचा किल्लेदार रायनाक महार होता तसेच दुसर्या महत्वाच्या रोहीडा किल्ल्याच्या नाईक पदाची जिम्मेदारी कालनाक महार व सोंडकर महार यांच्या पदरी होती.
संभाजी राजेची बर्हाणपुरात धिंड काढल्याने पाहून एकटाच बंड संभाजी राजेंच्या आजूबाजूचे 15-20 गनिम कापणारा रायप्पा महार आणि संभाजी राजेंच्या हत्येनंतर पेटलेल्या संग्रामात मोगलांच्या नाकात दम आणणारे नागेवाडीच्या महार व मौजे वेलंग चे सिदनाक महार होते. यानंतरही मराठे व पुढे पेशव्यांनी चालवलेले राज्य हे स्वराज्य आहे म्हणून त्याकडे वाकड्या डोळ्याने पाहणार्या मुघल व ब्रिटीश फौजे विरूध्द तळहातावर शिर घेऊन लढणारे कित्येक योध्दे महार जातीचेच होते. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांनी पेशव्यांना अनेक लढाया जिंकून दिल्या. तरीसुद्धा पेशवे ब्राह्मणी अहंकारामुळे शुरवीर महारांचा सदैव अपमान व अवहेलनाच करायचे.
शिदनाक महार व त्यांच्या सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमामुळे माधवराव पेशव्याला खर्ड्याच्या विजय प्राप्त झाला परंतु त्याकडे दुर्लक्ष करून विजयाच्या उन्मादात ब्राम्हणांनी त्याच रणांगनावर शिदनाक व त्यांच्या महार सैनिकांचा अपमान केला.
प्रत्येक लढाईतील महारांचा पराक्रम व त्यांच्यामुळे मिळणारे यश पाहून पेशव्यांचा उर धपापल्या जायचा आणि याचमुळे त्यांना महारांची धास्ती वाटायची. कदाचित 'आपण जसे शिवरायांचे राज्य बळकावले तसे महारांनी आपले राज्य हिरावून घेतले तर....... ही भिती वाटत असावी शेवटी चोराच्या मनात चांदणे.
केवळ याच कारणामुळे इतर अतिशूद्र जातींपेक्षा महार जातीचा पेशवे अतिशय द्वेष करायचे म्हणून महारांना काबूत ठेवण्यासाठी कोकणस्थ ब्राम्हण पेशव्यांनी सत्ता व धर्माच्या जोरावर महारांवर कडक बंधने घातली. महारांचे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक हक्क हिरावून घेतले. महार, मांग, चांभार अतिशुद्र व अस्पृश्य म्हणून गावकुसाबाहेर राहण्यास बाध्य केले. त्यांनी कसे रहावे, कसे वागावे, काय करावे याबद्दल विशेष नियम केले आणि मनुस्मृती प्रमाणे त्या नियमांचे कायदे केले. त्या कायद्यांचे उल्लंघन करणार्यांना कडक शिक्षा देण्याचे फरमान काढण्यात आले.
हे कायदे कोणते होते
● अस्पृश्यांना स्पर्श करणे पाप आहे त्यांची सावली सुद्धा अंगावर पडू देऊ नये
● अस्पृश्यांना गावामध्ये दिवसा गावबंदी. प्रवेश करावयचाच असेल तर त्यांनी सूर्योदयापूर्वी आणि सुर्यास्तानंतरच करावा
● अस्पृश्यांनी सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी भरण्यास बंदी, देवदर्शनास बंदी, देवळाच्या पायरीवर चढण्यास बंदी, शिक्षणास बंदी.
● अस्पृश्य समाजाच्या लोकांनी थुंकण्यासाठी गळ्यात मडके व रस्त्यावरून चालताना उमटलेल्या पाऊलखुणा व रस्ता साफ करण्यासाठी कमरेला झाडू बांधण्याची सक्ती.
● ब्राम्हण दिसताच अस्पृश्यांनी त्वरित खाली बसून पालथे पडावे.
● दुसर्या बाजीराव पेशव्याच्या काळात महार किंवा मांग तालीमाखान्यापुढून जातांना दिसला तर गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळल्या जात असे
या अमानवीय कायदे व अत्याचाराबद्दल ब्रिटीश सेनापती फोर्बेस ने लिहिले आहे की, "त्या गरीब व जातीबाहेर फेकण्यात आलेल्या चांडाळाच्या स्थितीचे वर्णन मी कशा प्रकारे करू?. त्यांना शहरात वास्तव्य करण्याची मुभा नव्हती. गावात त्यांना सकाळी नऊ च्या अगोदर व दुपारी तीन नंतर फिरण्याची सक्त मनाई असे. त्यांना वेशीबाहेर दूर अंतरावर गलिच्छ व दरिद्री राहून झोपड्या बांधून राहण्यास भाग पाडल्या जात होते. त्यांची दारुण अवस्था बघितली की माझे अश्रू आवरणेही मला कठीण होत असे. मी माझ्या क्षेत्रात या अस्पृश्यांची सुधारणा करण्याचे प्रयत्न केले पण वरिष्ठ जातीच्या मनात अस्पृश्यतेबद्दल इतके खोलवर रुजलेले गैरसमज आहेत की माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले." (बॉम्बे गॅझेटियर 1884-85)
ब्राम्हण पेशवे महारांची रणांगनावरील कर्तबगारी व पराक्रम बघून महारांचा द्वेष करायचे तरी महारांच्या पराक्रमावर आणि शौर्यावर राजवाड्यातील ब्राम्हण बायका भाळून जायच्या यामुळे त्यांच्यामधील काही स्त्रियांचे महारासोबत प्रेमप्रकरणे चालायची यातील एखादे प्रकरण उघडकीस आले तर त्या महाराचा खून केल्या जायचा गणपत महाराचा खून याच कारणासाठी केल्या गेल्या होता. अशाच प्रकारे खून करण्यात आला होता.
पेशवाईत महारवर कोणीही अन्याय कोणीही अत्याचार करायचे आणि पर्याय नसल्याने त्यांना तो निमुटपणे सहनच करावा लागायचा. केवळ अन्याय करूनच पेशव्यांचे समाधान झाले नाही म्हणून महार-मांगाना बळी देण्याची क्रूर प्रथा सुद्धा त्यांनी सुरु केली. इमारतीच्या पायात, किल्ला, किल्ल्याचा बुरुज, पूल, तळे व बांधकामात अस्पृश्यांचा बळी दिल्या जात असे. “महार-मांगाला पायभरणीत पुरले” असे शब्दोल्लेख आजही अनेक लोककथेत ऐकायला मिळतात.
एवढे असूनही इंग्रज पुण्यावर चाल करून येत असल्याचे समजताच लढाईची परवानगी मागायला रायनाक, सिधनाक सारखे वीर शनिवारवाड्यावर गेले तेव्हा नाचगाण्यात दंग असलेल्या पेशव्यांचा रसभंग झाल्याने त्यांनी त्यांना पेशव्यांचे राज्य महार-मांगाच्या भरवशावर नाही म्हणून अपमानित करून हाकलून दिले आणि मग मात्र महारांचा स्फोट झाला. आतापर्यंत झेललेल्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी महारांचे हात शिवशिवू लागले चाणाक्ष इंग्रजानी महारांना जवळ केले आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेत 1 जानेवारी 1818 रोजी 500 महार भिमा नदीच्या काठावर कोरेगाव येथे दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या 25,000 सैन्यासोबत प्राणपणाने लढले आणि पेशव्यांच्या अफाट व सुशस्र सैन्याची धूळधाण करून त्याना पळती भुई कमी केले गर्वान्ध पेशवे महारांपुढे चारी मुंड्या चीत झाले. महारांच्या अविस्मरणीय शौर्याची व पेशव्यांच्या नाचक्कीची इतिहासात नोंद झाली. पेशव्यांची उरली सुरली इभ्रत महारांनी सोलापूर व आष्टीच्या काढली आणि पेशवाई नेस्तनाबूत केली तेव्हा कुठे महार मांग जातीवरील अमानवीय छळाचा महारांच्या उरातील ज्वालामुखी शांत झाला.
बाबासाहेब म्हणायचे, " गुलामाला त्याच्या गुलामगिरीची आठवण करून द्या जेणेकरून तो बंड करून उठेल "
जय जिजाऊ..जय शिवराय.. जय शंभूराजे.. जय भिम.. जय भारत..!

Wednesday 10 February 2016

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ऐतिहासिक कामगिरी…



छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ऐतिहासिक कामगिरी…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार होते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. महाराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी
सिद्दी हिलाल
घोडदळातील सेनापती सहाय्यक
पन्हाळगडाच्या वेढ्यात ( मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले.
उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले.
 
सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र)
घोडदळातील सरदार
सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी ( मार्च १६६०) आणि कैद.
 
सिद्दी इब्राहिम
शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार
अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली.
सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले.
 
नूरखान बेग
स्वराज्याचा पहिला सरनोबत
२१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली.
 
मदारी मेहतर
विश्वासू सेवक
आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत.
 
काझी हैदर
शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव
१६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले. खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले.
 
शमाखान
सरदार
कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकून घेतली.
 
सिद्दी अंबर वहाब
हवालदार
जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला
 
हुसेनखान मियाना
लष्करातील अधिकारी
मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला.
बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च १६७९) जिंकले.
 
रुस्तमेजनमा
शिवाजी महाराजांचा खास मित्र
विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले.
हुबळीच्या लुटीत कामगिरी ( जानेवारी १६६५) चोख पार पाडली.
नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली.
सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले.
 
दर्यासारंग
आरमाराचा पहिला सुभेदार
खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला.
बसनूर जानेवारी ते फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले.
 
इब्राहीम खान
आरमारातील अधिकारी
खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या जानेवारी ते फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्राम केला.
 
दौलतखान
आरमाराचा प्रमुख (सुभेदार)
उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०)
खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८)
सिद्दी संबुळचा पराभव ( एप्रिल १६७४)
 
सिद्दी मिस्त्री
आरमारातील अधिकारी
खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्या लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला.
 
सुलतान खान
आरमाराचा सुभेदार
शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार.
 
दाऊतखान
आरमाराचा सुभेदार
अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला.
सुलतान खान नंतर सुभेदार झाला.
पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला.
 
इब्राहिम खान
तोफखान्याचा प्रमुख
स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख.
डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली.
 
विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण पायदळ आणि घोडदळ १६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही.
घोडदळातील चार मोगली पथके घोडदळातील सरदार आणि सैनिक मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली.
(
प्रेम हनवते यांच्याशिवरायांच्या निष्ठावंत मुस्लिम सैनिकया पुस्तकामधून…)